सांगली जिल्हयातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण : माजी खासदार संजयकाका पाटील यांची माहिती
सांगली जिल्हयातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन त्यांचा सातबारा कोरा करणे या मागणीकरिता माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्यावतीने शुक्रवार, दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणेत येणार आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे.
यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील म्हणाले, सांगली जिल्हयामध्ये सध्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व शेतीपीकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे सांगली जिल्हयातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. गेल्या काही वर्षापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना वेळोवेळी नुकसानीला सामोरे जावे लागलेले आहे. शेती करताना शेतकरी सोसायटी, पतपेढया व बँकामधून कर्जे घेत असतात, परंतु शेती पीकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न न मिळाल्यामुळे त्यांना कर्ज भरणे शक्य होत नाही. सांगली जिल्हयातील शेतकऱ्यांची हीच अवस्था असल्याने त्यांना या गोष्टीचा नाहक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे जिल्हयातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतीपीकाचे नुकसान होवूनही कर्ज वसुलीकरिता शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातो अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. याकरिता यावर उपाय म्हणून जिल्हयातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देवून त्यांचा सातबारा कोरा करणे हाच एकमेव पर्याय शेतकरी हिताचा आहे. राज्य सरकारने शेतकरी हितासाठी सरसकट कर्जमाफी व सातबारा कोरा करणेसाठी हे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.
शेतकरी हिताचा व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढल्या जाणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल. सध्या शेतकरी नेते बच्चू कडू यांचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसहीत इतर मागण्याकरीता राज्यभरात आंदोलन सुरु आहे, त्या आंदोलनासही आमचा पाठिंबा आहे, असे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले
